जाणून घ्या भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील उर्दू हस्तलिखितांचे योगदान

नाशिक : भारत सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालयाचे 'ज्ञान भारतम मिशन' (पूर्वीचे 'नॅशनल मिशन फॉर मॅन्युस्क्रिप्ट')  आणि यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठातील मानव्यविद्या व सामाजिकशासे विद्याशाखा यांच्या संयुक्त विद्यमाने 'भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील उर्दू हस्तलिखितांचे योगदान (१७५७ - १९४७)' या विषयावर तीन दिवसीय राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे. विद्यापीठाचे मा. कुलगुरु प्रा. संजीव सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली सदर चर्चासत्र येत्या बुधवार दिनांक १४ मे ते शुक्रवार दिनांक १६ मे २०२५ या कालावधीत विद्यापीठातील शैक्षणिक इमारतीतील सभागृहामध्ये होणार आहे.

'ज्ञान भारतम मिशन' तर्फे उर्दू भाषा आणि साहित्याचे संवर्धन करण्याच्या उद्देशाने देशभरातील उच्च शिक्षण संस्थांकडून प्रस्ताव मागविण्यात आले होते. त्याला प्रतिसाद म्हणून मुक्त विद्यापीठातर्फे उपरोक्त विषयावर प्रस्ताव पाठविण्यात आला होता. त्यास केंद्र शासनाच्या सांस्कृतिक मंत्रालयाकडून मंजूरी प्राप्त झाल्यानंतर या चर्चासत्रासाठी विविध राज्यांतील उर्दू भाषा आणि साहित्याच्या अभ्यासकांकडून संशोधन लेख निमंत्रित करण्यात आले आहेत. सन १७५७ ते १९४७ दरम्यान भारतीय स्वातंत्र्यलढ्यात उर्दू भाषेतील विविध प्रकारच्या हस्तलिखितांचे योगदान महत्त्वाचे होते. या योगदानाबद्दल या चर्चासत्रात विविध संशोधक आपापले लेख सादर करणार आहेत. चर्चासत्राच्या उद्घाटन प्रसंगी केंद्र शासनाच्या सांस्कृतिक मंत्रालयाचे प्रतिनिधी म्हणून 'ज्ञान भारतम मिशन'चे संचालक प्रा. अनिर्बन दास उपस्थित राहणार आहेत तर प्रा. मोहम्मद महफूज खान (जेष्ठ उर्दू अभ्यासक, जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठ, नवी दिल्ली) यांचे बीजभाषण होईल. विद्यापीठाचे मा. कुलगुरू प्रा. संजीव सोनवणे, प्र-कुलगुरू प्रा. जोगेंद्रसिंह बिसेन, कुलसचिव श्री. दिलीप भरड यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. चर्चासत्रात सहभागी होण्यासाठी आणि इतर माहितीसाठी इच्छुकांनी चर्चासत्र व शैक्षणिक संयोजक डॉ. रशीद खान (८८२८२८२८७४) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन विद्याशाखेचे संचालक प्रा. नागार्जुन वाडेकर यांनी केले आहे.