नवी दिल्ली, २२ मे २०२५

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज दि. २२ मे २०२५ रोजी राष्ट्रपती भवनात झालेल्या संरक्षण पुरस्कार सोहळा – २०२५ च्या पहिल्या टप्प्यातील शौर्य पुरस्कार प्रदान केले. उपराष्ट्रपती, पंतप्रधान आणि संरक्षण मंत्री आदी मान्यवर या सोहळ्याला उपस्थित होते.

 


राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी देवेन सी, कॉन्स्टेबल/जीडी, सीआरपीएफ (मरणोत्तर) यांना शौर्य चक्र प्रदान केले. जानेवारी २०२४ मध्ये छत्तीसगढमधील सुकमा जिल्ह्यातील टेकलगुडियम येथे नवीन फॉरवर्ड ऑपरेटिंग बेस स्थापन करण्यासाठी सीआरपीएफने सुरू केलेल्या ऑपरेशनदरम्यान, त्यांनी प्राणांची पर्वा न करता आक्रमण करणाऱ्या नक्षलवाद्यांशी जोरदार लढा दिला. कॉन्स्टेबल/जीडी देवन कुमार यांना एक स्नायपरने गोळी मारल्याने ते शहीद झाले.


"
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी नाईक दिलवार खान, द रेजिमेंट ऑफ आर्टिलरी, २८ राष्ट्रीय रायफल्स (मरणोत्तर) यांना कीर्ती चक्र प्रदान केले. कुपवाडा जिल्ह्यातील लोलाब खोऱ्यातील दाट जंगलात सापळा रचून केलेल्या कारवाईदरम्यान, त्यांच्या पथकाने दोन दहशतवाद्यांना पाहिले, त्यापैकी एक फारच जवळ होता. जखमी असूनही त्यांनी धैर्य गमावले नाही आणि विलक्षण चिकाटी दाखवत त्या दहशतवाद्याला हाताळले व अतिशय जवळून त्याला ठार केले. त्यानंतर त्यांनी वीरमरण पत्करले."



"राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी हिमायुन मुज़म्मिल भट, उपअधीक्षक, जम्मू आणि काश्मीर पोलीस (मरणोत्तर) यांना कीर्ती चक्र प्रदान केले. सप्टेंबर २०२३ मध्ये अनंतनाग जिल्ह्यात झालेल्या चकमकीदरम्यान, त्यांनी स्वतःच्या सुरक्षिततेकडे दुर्लक्ष करून दहशतवाद्यांचा सामना केला. गंभीर गोळीबार जखमा झाल्यानंतरही त्यांनी गोळीबार सुरू ठेवला आणि दहशतवाद्यांना पळून जाण्यापासून रोखले."



"राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी कर्नल मनप्रीत सिंग, द सिख लाइट इन्फंट्री, १९ राष्ट्रीय रायफल्स (मरणोत्तर) यांना कीर्ती चक्र प्रदान केले. सप्टेंबर २०२३ मध्ये अनंतनाग जिल्ह्यात दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीदरम्यान, त्यांनी अत्युत्तम नेतृत्व व शौर्याचे दर्शन घडवत एका दहशतवाद्याचा खात्मा केला. तीव्र गोळीबाराच्या दरम्यान त्यांच्या कपाळावर गोळी लागून त्यांचे वीरमरण झाले."



"राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी रायफलमन रवि कुमार, द जम्मू अ‍ॅन्ड काश्मीर लाइट इन्फंट्री, ६३ राष्ट्रीय रायफल्स (मरणोत्तर) यांना कीर्ती चक्र प्रदान केले. भारतीय सेनेच्या सर्वोच्च परंपरेनुसार त्यांनी सर्वोच्च बलिदान दिले. अत्यंत गंभीर संकटाच्या वेळी दाखवलेल्या त्यांच्या शौर्य, धैर्य आणि निःस्वार्थतेचे प्रतीक त्यांच्या कृती होत्या. दोन कडवट दहशतवाद्यांचा खात्मा करण्याबरोबरच त्यांच्या शौर्यामुळे संपूर्ण बटालियनला प्रेरणा मिळाली."

शौर्य पुरस्कारविजेत्यांची यादी आणि वितरण समारंभाची छायाचित्रे पाहण्यासाठी येथे क्लिक करा