रेल्वेचा शोध हा आधुनिक जगात झालेल्या सर्वात प्रभावी आणि ऐतिहासिक शोधांपैकी एक मानला जातो. खरं तर भारतीय रेल्वेचा इतिहास खूप जुना आहे.
ब्रिटिशांनी त्यांच्या व्यापारासाठी भारतात रेल्वेचे जाळे पसरवले होते आणि हळूहळू रेल्वे भारतीयांसाठी लाईफलाईन बनली. १६ एप्रिल १८५३ रोजी मुंबईमधील बोरीबंदर आणि ठाणे दरम्यान देशातील पहिली प्रवासी रेल्वे धावली. आज भारतीय रेल्वे हे जगातील चौथ्या क्रमांकाचे सर्वात मोठे रेल्वे नेटवर्क आहे.भारतीय रेल्वेने केवळ अंतर मिटवले नाही तर लोकांचे स्वप्न, संस्कृती आणि आणि इतिहासही आपल्या गाड्यांतून वाहून नेला. या शतकभरच्या प्रवासात काही गाड्या अशा आहेत, ज्या आजही आपल्या इतिहासाच्या जिवंत साक्षीदार आहेत. त्यातीलच एक नाव म्हणजे ‘पंजाब मेल’. भारतीय रेल्वेतील सर्वात जुन्या रेल्वेगाड्यांपैकी एक असलेल्या पंजाब मेलने १ जून २०२५ रोजी गौरवशाली ११४व्या वर्षात प्रवेश केला. याच दिवशी डेक्कन क्वीन अर्थात दख्खनच्या राणीलाही सुरू होऊन ९५ वर्ष पूर्ण होताय. पंजाब मेल गेल्या ११३ वर्षांपासून ही रेल्वेगाडी अखंडपणे प्रवाशांच्या सेवेत कार्यरत आहे. ही रेल्वे पहिल्यांदा १ जून १९१२ रोजी ‘बॅलार्ड पियर मोल’ स्थानकावरून रवाना झाली होती.
ब्रिटिश राजवटीत ‘पंजाब लिमिटेड’ या नावाने ओळखली जाणारी ही गाडी सुरवातीला मुंबईपासून पेशावरपर्यंत धावत होती. त्या वेळी ही गाडी ग्रेट इंडियन पेनिन्सुला रेल्वे (GIPR)चा एक भाग होती. एकूण २४९६ किलोमीटरच्या या प्रदीर्घ प्रवासासाठी गाडीला ४७ तास लागायचे. फाळणीपूर्व काळात ‘पंजाब लिमिटेड’ ही भारतातील सर्वात वेगवान रेल्वेगाडी होती. तिच्या मार्गामध्ये इटारसी, आग्रा, दिल्ली, लाहोर आणि पेशावर यांसारख्या महत्त्वाच्या शहरांचा समावेश होता.
१९४७च्या भारत पाकिस्तान विभाजनानंतर, पंजाब मेलचा प्रवास पेशावरऐवजी कॅन्टोन्मेंटपर्यंत मर्यादित करण्यात आला. १९१४ पासून ही रेल्वे मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) ते फिरोजपूर दरम्यान दररोज धावू लागली आणि नंतर ती ‘पंजाब लिमिटेड’ ऐवजी ‘पंजाब मेल’ म्हणून ओळखली जाऊ लागली. मुंबई ते दिल्ली दरम्यानचा 'जीआयपीआर' मार्ग १९१४ साली सुमारे १,५४१ किलोमीटर लांबीचा होता. पंजाब मेल या गाडीला हे अंतर पार करण्यासाठी त्या काळात २९ तास ३० मिनिटे लागायची. १९२० मध्ये तांत्रिक सुधारणांमुळे हा प्रवास कालावधी कमी करून २७ तास १० मिनिटांवर आणण्यात आला. मात्र, १९७२ मध्ये गाडीचे थांबे वाढवण्यात आल्याने प्रवासाचा कालावधी पुन्हा वाढून जवळपास २९ तासांवर पोहोचला. आजची पंजाब मेल एक्सप्रेस सीएसएमटी, मुंबई येथून फिरोजपूर छावणीपर्यंत १,९२८ किलोमीटरचे अंतर पूर्ण करते. हा प्रवास ३३ तास ३५ मिनिटांत पार केला जातो. या दरम्यान, ही गाडी ५२ स्थानकांवर थांबते.
गाडीतील डब्ब्यांची रचना, ट्रॅक्शन सिस्टीम, प्रवासी क्षमतेपासून ते वातानुकूलित सुविधांपर्यंतच्या अनेक टप्प्यांतून पंजाब मेलने आधुनिकतेचा स्वीकार करत आजच्या स्वरूपात प्रवास केला आहे. प्रारंभी पंजाब मेलमध्ये एकूण सहा डब्बे होते, त्यापैकी तीन प्रवाशांसाठी आणि तीन डब्बे डाक समान व पार्सलसाठी वापरले जात होते. तीन प्रवासी डब्ब्यांमध्ये सुमारे २८८ प्रवासी बसू शकत होते. १९३० मध्ये गाडीत तृतीय श्रेणीचे डब्बे समाविष्ट करण्यात आले. १९४५ साली, या गाडीमध्ये वातानुकूलित (एसी) डब्ब्यांचा समावेश करण्यात आला. १९६८ मध्ये, गाडी झाशीपर्यंत डिझेल इंजिनावर चालू लागली आणि नंतर १९७६ पर्यंत झाशीहून नवी दिल्लीमार्गे फिरोजपूरपर्यंत ही सेवा वाढवण्यात आली. १९७० च्या उत्तरार्धात आणि १९८० च्या प्रारंभी, इगतपुरीपर्यंत इलेक्ट्रिक इंजिनांवर गाडी चालवण्यासाठी WCAM/1 प्रकारच्या द्विधा विद्युत इंजिनांचा वापर करण्यात आला. त्यानंतर पुढच्या प्रवासासाठी इंजिन बदलले जात असे.
पंजाब मेलच्या पारंपरिक डब्ब्यांच्या जागी आता एलएचबी (LHB) कोच वापरले जात असून, १ डिसेंबर २०२० पासून पंजाब मेल ही एलएचबी डब्ब्यांसह धावू लागली आहे. आता ही गाडी पूर्णपणे विद्युत इंजिनावर चालते. यामध्ये पूर्वी असलेल्या रेस्टॉरंट कारच्या जागी 'पँट्रीकार' समाविष्ट करण्यात आली आहे. सध्या ही गाडी २५०% पेक्षा जास्त क्षमतेसह धावत आहे. सध्या या मेलला १ वातानुकूलित प्रथम श्रेणीसह द्वितीय वातानुकूलित, २ द्वितीय वातानुकूलित, ६ तृतीय वातानुकूलित, ६ शयनयान, ४ सामान्य द्वितीय श्रेणी, १ जनरेटर व्हॅन आणि १ ‘एसएलआर’ (सेकंड लगेज आणि गार्ड व्हॅन) डबे आहेत.
शतकाहून अधिक काळ प्रवाशांची निःस्वार्थ सेवा करणारी पंजाब मेल आजही हजारो प्रवाशांना एक सुरक्षित आणि स्वस्त आणि प्रवास देत आहे, हे तिच्या विश्वासार्हतेचं जिवंत उदाहरण आहे. इतिहास, परंपरा आणि प्रगती यांचा संगम असलेली पंजाब मेल भविष्यातही भारतीय रेल्वेच्या गौरवाचा एक अविभाज्य भाग राहणार आहे.
1 Comments
Nicely Written
ReplyDeletePost a Comment
Please do not add any spam link in the comment box.