क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर आधारित ‘संघर्षयात्री – सावित्री’ या एकपात्री प्रयोगाचा पन्नासावा प्रयोग अत्यंत दिमाखात पार पडला.

मुंबई – वार्ताहर

संध्या पानसकर यांनी सादर केलेला हा प्रयोग बुधवार, दि. ८ एप्रिल २०२६ रोजी मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृह इथे संपन्न झाला. आकृती थिएटरची निर्मिती आणि संकल्प थिएटर प्रकाशित या एकपात्री प्रयोगाची संकल्पना शाहीर संदेश गायकवाड यांची आहे तर याचे लेखक, दिग्दर्शनही त्यांचेच आहे. या प्रयोगाच्या निर्मिती प्रमुख संध्या पानसकर आहेत.

    


यावेळी महाड सत्याग्रहाचे संघटक कॉ. आर. बी. मोरे लिखित ‘महाड चवदार तळे सत्याग्रह’ या पुस्तकाचे प्रकाशन झाले. यावेळी विचारमंचावर ज्येष्ठ आंबेडकरी विचारवंत ज. वि. पवार,  ज्येष्ठ नाटककार प्रेमानंद गज्वी, सामाजिक कार्यकर्ते सुरेश सावंत, छाया दातार, सुबोध मोरे हे उपस्थित होते.



‘संघर्षयात्री – सावित्री’ या प्रयोगाची सुरुवात अनहद या बाल गायकाने गायलेल्या सावित्री गौरव गीताने झाली. यानंतर संध्या पानसकर यांनी सावित्रीबाईंच्या आयुष्यातील जोतीराव आणि इतर अनेकांच्या भूमिका सादर करत सावित्रीबाईंचे कार्य उभे केले. या सोबतच त्यांनी आजकालच्या स्त्रियांचा भंपकपणा आणि त्यातून येणारी नवी गुलामगिरी यावर चपखल भाष्य केलं. उपस्थितांनीही त्यांच्या अनेक संवादांवर टाळयांच्या गजरात दाद दिली.





प्रयोगाच्या समारोपाच्या वेळी आपल्या पन्नास प्रयोगांविषयी शाहीर संदेश गायकवाड आणि संध्या पानसकर यांनी माहिती दिली. १० मिनिटाचा एक प्रयोग ते आज सव्वातासाच्या प्रयोगात झालेलं स्थित्यंतर हे त्यांच्या अविरत श्रम आणि समर्पणाचे प्रतिक असल्याचं त्यांनी त्यांच्या कृतीतून सिद्ध केलं हे ठायीठायी जाणवत होतं. त्यांच्या या प्रवासात अनेकांकडून लाभलेल्या मार्गदर्शनासाठी संदेश गायकवाड यांनी कृतज्ञता व्यक्त केली. यात प्रा. आशालता कांबळे यांच्या ‘सावित्रीबाई फुले साहित्य मीमांसा’ या ग्रंथाचा मोठा हातभार असल्याचं त्यांनी नमूद केलं.



या प्रयोगाला समाजातील अनेक प्रथितयश मान्यवर उपस्थित होते. मुंबई महानगरपालिकेच्या उपयुक्त चंदा जाधव, कार्यकर्ते सुमेध जाधव, रवी भिलाणे, ज्योती बडेकर, संजीवनी राजगुरू, वर्षा विद्या विलास, शारदा नवले, अभिनेत्री दीपाली बडेकर यांसह अनेक मान्यवरांनी या एकपात्री प्रयोगाची प्रशंसा केली आणि पुढील प्रयोगांसाठी सदिच्छा दिल्या.

या नाट्य प्रयोगाला अक्षय जाधव यांचे पार्श्वसंगीत, सुनील मेस्त्री यांची प्रकाश योजना, सुनील देवळेकर यांचे नेपथ्य, चंदर पाटील यांची रंगभूषा तर विक्रांत तांबे याची वेशभूषा लाभली आहे. रंगमंच व्यवस्था दीपक गमरे आणि अनहद यांनी सांभाळली तर अनिल कदम हे सूत्रधार होते.