१७ डिसेंबर पर्यंत पार पडलेल्या जनजागृती सप्ताहात माहिती उघड

जव्हार : सागरी, नागरी आणि डोंगरी अशी रचना आलेल्या पालघर जिल्ह्यात शासन तथा प्रशासन स्तरावर आरोग्याच्या दृष्टीने चांगले नियोजन करण्यात आल्याने येथील रुग्णांना दिलासा मिळत आहे.दरम्यान, पालघर जिल्ह्यात सिकल सेल रुग्ण बाबत १७ डिसेंबर पर्यंत जनजागृती सप्ताह राबविण्यात आला त्यात सोळाशे रुग्ण आढळले असल्याची माहिती जिल्हा आरोग्य विभागाने दिली आहे.
पालघर जिल्ह्यात सुमारे सोळाशे सिकलसेल रुग्ण आढळले आहेत. सिकलसेलबाबत नागरिकांना जनजागृती करण्याच्या उद्देशाने आरोग्य विभागातर्फे १७ डिसेंबरपर्यंत जनजागृती सप्ताह राबवण्यात आला. दरम्यान, पालघर जिल्ह्यात २००९ पासून २०२४ या १४ वर्षांत १३ लाख ९६ हजार ३५३ सिकलसेल तपासण्या करणात आल्या आहेत. यात २४ हजार २२८ वाहक, तर सोळाशे सिकलसेलग्रस्त रुग्ण आढळले. रुग्णांना मोफत औषधोपचार, रक्तपुरवठा, समुपदेशन करण्यात येत आहे. दरम्यान, संजय गांधी निराधार योजनेंतर्गत आर्थिक लाभसुद्धा देण्यात येत आहे, असे जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने सांगितले आहे.

काय आहे सिकलसेल आजार?
सिकलसेल आजार हा अनुवांशिक आहे. आईवडिलांपासून अपत्यांना होणारा हा रक्तपेशींशी संबंधित आजार आहे. सिकलसेलच्या रक्तपेशी विळ्याच्या आकाराच्या व ताठर असतात. या पेशी वाहिन्यांना चिटकून राहतात. त्यामुळे अडथळा निर्माण करून, त्या भागातील रक्तपुरवठा खंडित होतो. अशा परिस्थितीत रुग्णाला असह्य वेदना होतात. सिकलसेल रुग्णांना हाडे, सर्वात महत्त्वाचे म्हणजे डोळे, स्वादूपिंड, त्वचा, पित्ताशयावर विपरित परिणाम होण्याची शक्यता असते. या आजाराला प्रतिबंध करायचा असेल तर वाहक वाहक, रुग्ण रुग्ण यांनी आपसात विवाह करू नये. कारण होणारे अपत्य हे सिकलसेल वाहक किंवा रुग्ण होतो. सिकलसेल आजारावर संपूर्ण उपचार नाही. मात्र यावर नियंत्रण शक्य आहे. सिकलसेल रुग्णास नियमित आणि समतोल आहार आवश्यक आहे. एकंदरीत सिकलसेल तपासण्या काही वर्षांपासून सातत्याने सुरू आहेत.असे अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. किरण पाटील यांनी सांगितले.

सिकलसेलची लक्षणे
रक्तातील होमोग्लोबीनचे प्रमाण कमी होणे, हातापायावर सूज येणे, भूक मंदावणे, सांधे दुखणे, असा होणे, लवकर थकवा येणे, चेहरा निस्तेज दिसणे,लहान बालकांना वारंवार जंतुसंसर्ग होणे, शरीर पिवळसर होणे.

सिकलसेल रुग्णांना सवलत
सिकलसेल रुग्णाला मोफत औषधोपचार, रक्तपुरवठा, समुपदेशन करण्यात येते. त्याप्रमाणे सिकलसेल रुग्णाला (एसएस पटर्न) संजय गांधी निराधार योजनेंतर्गत आर्थिक लाभ देण्यात येते. दहावी आणि बारावीतील विद्यार्थ्यांना परीक्षेच्या वेळी प्रत्येक पेपरला २० मिनिट अधिक अवधी देण्यात येतो. सिकलसेल रुग्णांना बस प्रवासात सवलत मिळते.