भारताच्या नवरचनेत ज्यांनी नवी प्रेरणा, नवे आदर्श आणि सशक्त दृष्टी प्राप्त करून दिली तसेच वैचारिक आणि सांस्कृतिक नवचैतन्यात ज्यांनी तेजाची ज्वाळा पेटवली असे वैशिष्ट्यपूर्ण आणि असाधारण कार्य करणारे थोर विभूती म्हणजे गुरुदेव रवींद्रनाथ टागोर. ७ मे १८६१ रोजी रवींद्रनाथांचा जन्म झाला. रवींद्रनाथांचा आत्मा कलावंताचा असून ते उपजत कवी, संगीतकार, कथाकार, कादंबरीकार, शिक्षक, शिक्षणतज्ज्ञ आणि चित्रकार होते. ‘जनगणमन’ हे अत्यंत गौरवपूर्ण राष्ट्रगीत रचणारे, ‘गीतांजली’ या काव्यसंग्रहासाठी नोबेल पुरस्काराने साहित्याच्या परंपरेला नवा आयाम मिळवून देणारे आणि पाश्चिमात्य जगाला भारतीय बुद्धीच्या गहनतेची अद्वितीय झलक दाखविणारे बहुआयामी व्यक्तिमत्त्व म्हणजे रवींद्रनाथ टागोर. त्यांचे संपूर्ण जीवन कलेच्या उपासनेला वाहिलेले होते. 

    रवींद्रनाथ टागोर यांनी शिक्षण क्षेत्रात दिलेले आपले शैक्षणिक विचार अत्यंत मोलाचे आहेत. कल्पना करा.. एका वटवृक्षाखाली काही मुले बसली आहेत. आजूबाजूला पक्ष्यांचे आवाज, वाऱ्याची सळसळ, आणि जिज्ञासेची एक शांत झुळूक वातावरणात आहे. शिकवणारा शिक्षक नाही पण संवाद आहे, प्रयोग आहेत, अनुभव आहेत. हेच होतं रवींद्रनाथ टागोर यांचं शिक्षणाचं जग.. मुक्त, सर्जनशील आणि नैसर्गिक. निसर्गाचा स्वभाव ओळखून, त्याला गुरू मानून कार्य करीत राहण्याची प्रेरणा रवीन्द्रनाथांनी उत्कटतेने घेतली होती आणि म्हणूनच रवींद्रनाथांची शाळा हा त्यांच्या जीवनव्यापी तत्त्वज्ञानाचाच त्यांच्या काव्यासारखाच एक सुंदर आविष्कार आहे. शाळेच्या चार भिंतीतून मुक्त झाल्यानंतरच आपलं खरं शिक्षण सुरू झालं हे रवींद्रनाथांच्या लहानपणीच लक्षात आलं होतं आणि म्हणूनच इतरांच्या दृष्टीने उजाड असलेल्या असणाऱ्या शांतिनिकेतनच्या माळावर शाळा काढायचं त्यांनी ठरवलं. निर्मितिक्षम प्रतिभा, चिंतन-व्यासंगाने सबल झालेली प्रज्ञा आणि अनेक प्रकारच्या माणसांच्या स्नेहातून, त्यांच्या सुखदुःखाच्या कथा ऐकून मनात उपजलेलं प्रेम आणि करुणा ह्या साऱ्या गुणांच्या समन्वयातून रवीन्द्रांची शाळा जन्माला आली. ती आधुनिक युगाच्या विश्वबंधुत्वाच्या भावाशी समरस झालेली असून, तिने प्राचीन शिक्षणाच्या मूलभूत मूल्यांची नीट जोपासना केली.

    टागोरांच्या या कल्पनांना त्यांच्या वैयक्तिक अनुभवाचे पाठबळ होते. त्यांच्या बालपणात शाळेतून शिक्षण घेतांना त्यांना ज्या दिव्यांतून जावे लागले होते ती दिव्ये, भारतीय शाळांतील विद्यार्थ्यांच्या करुणाजनक परिस्थितीचे त्यांना झालेले दर्शन, आणि स्वतःच्या दृढमतांच्या अनुरोधाने त्यांनी स्वतःच्या पुत्राला शिकविण्यासाठी केलेले प्रयत्न, या सर्वांनी त्यांच्या सैद्धान्तिक अभ्यासापेक्षा अधिक प्रमाणात त्यांचे शिक्षणविषयक तत्त्वज्ञान आणि पद्धती यांचे निर्धारण केले. टागोरांच्या शिक्षणविषयक निबंधात भारतीय स्थितीची त्यांना असलेली उत्कट जाणीव आपणांस पाहावयास मिळते. शिक्षणातील त्यांच्या क्रांतिकारक संकल्पना या त्यांच्या राष्ट्रीयत्वाचा अविभाज्य भाग होता. त्या वेळी प्रचलित असलेली शिक्षणपद्धती ही परकी (alien) आणि म्हणून भारतीय बालकांना मानवणारी व अनुरुप नव्हती असा त्यांचा मूलभूत आक्षेप होता. 

    शिक्षणाच्या स्वरूपावर चिंतन करताना रवींद्रनाथ टागोर आधुनिक शिक्षणपद्धतीवर टीका करतात. त्यांना पारंपरिक, चाकोरीबद्ध शिक्षणपद्धती मान्य नव्हती. मुक्त, अनुभवप्रधान आणि सर्जनशील विचारांना चालना देणाऱ्या शिक्षणाची कल्पना त्यांनी मांडली. शिक्षण हे पुस्तकांपर्यंत मर्यादित किंवा वर्गांमध्ये बंदिस्त असू नये तर निसर्गाच्या सानिध्यात ते घडावं यावर टागोरांचा भर होता. परंतु दुर्दैवाने आज तंत्रज्ञानामुळे जीवनाच्या प्रत्येक पैलूवर नियंत्रण येत आहे आणि मुले त्यांच्या दैनंदिन जीवनात निसर्गाचा स्पर्श गमावत आहेत. हायपरकनेक्टिव्ह जग एका प्रकारच्या तुरुंगात बदलत चाललंय. आजच्या काळात टागोरांनी मांडलेला नैसर्गिक बाह्य शिक्षणाचा सकारात्मक परिणामाचा विचार अत्यंत आवश्यक ठरतो. निसर्गाच्या सानिध्यात घालवलेला वेळ दृष्टिकोनात बदल घडवून आणतो, सर्जनशीलता निर्माण करतो, प्रोत्साहन देतो, संवाद घडवून आणतो आणि परस्परात सहकार्याची भावना निर्माण करतो. 

    तत्कालीन प्रचलित शिक्षण-पद्धती बालकांचा नैसर्गिक आणि उत्फूर्त विकास होण्यावर आधारलेली नव्हती. केवळ माहितीचे भारे मुलांच्या मनात कोंबण्यापुरते शिक्षण मर्यादित असता कामा नये, मुलांना अस्तित्वाचे संपूर्ण सामंजस्य समजण्यास, त्याचा आनंद अनुभवण्यास आणि त्यात भर घालण्यास शिक्षणाने समर्थ बनविले पाहिजे असे टागोरांचे मत होते आणि ते आजच्या काळातही महत्त्वाचे ठरते. याशिवाय आजच्या शिक्षणव्यवस्थेत इंग्रजी भाषेला दिले गेलेले अत्याधिक महत्व हा चिंतनाचा विषय बनला आहे. केवळ स्पर्धेच्या युगात पुढे जाण्यासाठी ही भाषा शिकण्याचा अट्टहास लहान मुलांवर लादला जातो. या इंग्रजी भाषेतील शिक्षणाबद्दलही टागोरांनी त्यांचे मत परखडपणे मांडले आहे. “भाषा ही अजाणतेपणाची किंवा सहेतुकपणाने कोणाकडून उसनी मागून घ्यावयाच्या छत्रीसारखी किंवा ओव्हरकोटासारखी नसते. तर ती शरीराच्या प्रत्यक्ष प्राणपूर्ण त्वचेसारखी असते.” ज्या भाषेचा बालकाशी जिवंत संबंध नसतो अशा भाषेत त्याला शिकविणे अनैसर्गिक असते असे मत त्यांनी कटाक्षाने मांडले आहे. परंतु हे मत मांडतांना रवींद्रनाथ हे इंग्रजी साहित्याचे मोठे प्रशंसक असल्याने ते इंग्रजीचा वापर करण्यास संकुचित देशभक्तीच्या कारणास्तव विरोध करणारे नाहीत हे लक्षात घेणे आवश्यक आहे. त्यामुळे इतर देशांतून आलेले सांस्कृतिक प्रवाह अडवले असा त्याचा अर्थ अजिबातच नाही तर त्यांना मातृभाषा आणि आंतरराष्ट्रीय भाषेतील संतुलन राखणारी, मुलांच्या भावविश्वाशी जोडलेली शिक्षण पद्धती आवश्यक वाटते.


    मुलांना केवळ विचार करणारी यंत्रे बनण्यापासून वाचवणे आणि त्यांना अतिरेकी बुद्धिवादापासून दूर ठेवणे आवश्यक आहे. यासाठी त्यांच्या मानसिक अध्ययनाची सांगड सुखद आणि उपयुक्त शारीरिक कृतींशी घालणारी समतोल शिक्षणपद्धती विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी महत्त्वाची ठरते. या संदर्भात टागोरांनी प्राचीन भारतीय तपोवन जीवनशैलीची विशेष प्रशंसा केली आहे. ते सांगतात की, त्या काळी विद्यार्थी आपल्या गुरूंसमवेत कुरणात जनावरे चारण्यासाठी जात, झाडांची फळं, लाकूड, काटक्या गोळा करत आणि अशा प्रकारे ते समाजाच्या आर्थिक आणि बौद्धिक जीवनाशी सखोलपणे जोडले गेलेले असत. टागोरांच्या मते, हाच उद्देश आजच्या काळात हस्तकला व कुटीरउद्योगांद्वारे साध्य करता येऊ शकतो. उदा. विणकाम, सुतारकाम, मातीची भांडी बनविणे, टोपल्या विणणे, लाकडावर कोरीवकाम करणे इत्यादी उपयुक्त आणि आनंददायी कामांमध्ये विद्यार्थ्यांना गुंतवून त्यांचा मानसिक आणि शारीरिक विकास साधता येतो. एक शेत आणि हस्तकला केंद्र शान्तिनिकेतहून थोडे मैल अंतरावर 'श्रीनिकेतन' येथे स्थापन करून रवींद्रनाथांनी ही कल्पना प्रत्यक्षात साकार केली.

    टागोरांनी केवळ निरक्षरता घालवण्यासाठी किंवा सरकारी शाळा खात्याने नेमून दिलेले विषय शिकवण्यासाठी शांतिनिकेतनाचा प्रपंच मांडला नाही किंवा पदव्यांच्या वाटपासाठी विश्वभारती विद्यापीठाची स्थापना केली नाही, तर आधुनिक युगातील आदर्श भारतीय विद्यापीठात नालंदाचा विश्वैक्यवाद आणि ऑक्स्फर्ड, हायडेलबर्ग, सोर्बोन, यू ट्रेक्ट यांसारख्या विश्वविख्यात पाश्चात्य विद्यापीठांचा वैज्ञानिक दृष्टिकोण आणि ज्ञानावरील एकाग्र निष्ठा यांचा मिलाफ व्हावयास पाहिजे, ही गोष्ट रवींद्रनाथांनी आपल्या 'विश्वभारती' त प्रत्यक्षात आणण्यासाठी प्रयत्न केले. शिक्षण हा केवळ ज्ञानप्राप्तीचा मार्ग नसून, तो व्यक्तिमत्त्व घडविण्याचा एक सर्जनशील प्रवास असतो. त्यामुळे शिकणारा विद्यार्थी अधिक संवेदनशील, सौम्य, सहिष्णू आणि करुणाशील व्हावा, अशी दिशा शिक्षणाने दाखवली पाहिजे. ज्ञान हे केवळ वाचण्यात किंवा पाठांतरात सीमित न राहता त्याला कृतीची, अनुभवांची जोड मिळावी यासाठी शिकण्याची प्रक्रिया सर्वस्पर्शी असली पाहिजे आणि शिक्षकानेही आजीवन शिकत राहायला पाहिजे हे टागोरांचे विचार कालातीत आहेत.

    आजच्या स्पर्धात्मक, तंत्रज्ञानप्रधान आणि झपाट्याने बदलणाऱ्या युगात शिक्षण फक्त ज्ञान देणारी प्रक्रिया राहिलेली नाही, तर ती माणूस घडविण्याची आणि त्याला सर्जनशील, संवेदनशील, जबाबदार बनविण्याची संधी आहे. रवींद्रनाथ टागोर यांनी शंभर वर्षांपूर्वी मांडलेले विचार आजही तितकेच प्रासंगिक वाटतात. त्यांनी मांडलेली मुक्त, सजीव आणि अनुभवाधारित शिक्षणप्रणाली आजच्या संकुचित आणि गुणांवर आधारित शिक्षण व्यवस्थेसाठी एक दिशादर्शक ठरू शकते. कृतीशी एकरूप झालेलं शिक्षण, बालकांच्या विचारशक्तीला चालना देणारं वातावरण, आणि निसर्गाशी नातं जपणारी जीवनशैली हे टागोरांचे शिक्षणदर्शन आजच्या पिढीसाठी आशेचा किरण ठरू शकते. एक समृद्ध आणि प्रभावी शिक्षणव्यवस्था केवळ स्मरणशक्तीचा विकास न करता विचारशक्ती, कलात्मकता आणि कल्पनाशक्तीला पोषक असली पाहिजे. रवींद्रनाथ टागोरांचे हे शिक्षणविषयक विचार प्रत्येक युगाला नव्याने शिकण्याची, समजून घेण्याची आणि मनुष्यमात्राला समृद्ध करण्याची प्रेरणा देत असल्यामुळे ते शाश्वत आणि सर्वकालिक आहेत.